Soybean Update : आतापासूनच पुढील खरीप हंगामाची तयारी म्हणून घरघुती सोयाबीनच्या बियाणांची काळजी घेणे आणि बियाणे निश्चित करणे आवश्यक आहे.
तसेच सुरू असलेली "घरगुती बियाणांची चळवळ" सोयाबीन उत्पादक (Soybean Producer) असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याची गरज आहे.
कारण 2022 मध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाचा पडलेला खंड आणि काढणीच्यावेळी झालेल्या अतिवृष्टी आणि रोगराई यामुळे यंदाही परिपक्व सोयाबीनचे दाणे तयार झाले नाहीत.
हे शेतकऱ्यांकडील अपरिपक्व सोयाबीन जर बियाणे निर्मिती कंपन्यांनी पकडले असेल तर पुन्हा बोगस बियाणे पेरण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते.त्यामुळे शेतकऱ्यांनाच सोयाबीनच्या घरघुती बियाणांची काळजी घेऊन खरीप हंगामात वापरावे लागणार आहे.
जर कंपन्यांचे बोगस बियाणे निघाल्यामुळे दुबार-तिबार पेरणी केली तरी शासन किंवा बियाणे कंपन्या नुकसान भरपाई देणार नाहीत हे मात्र निश्चित आहे.
कारण 2020, 2021 आणि 2022 असा तिन्ही वर्षात बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत की शासनाने-कंपन्यांनी नुकसान भरपाई दिलेली नाही. कंपन्यांवर कारवाई देखील केलेली नाही.
खरीप हंगामातील सोयाबीनवर (पावसाचा खंड, अतिवृष्टी आणि रोगराई) झालेल्या परिणामामुळे या सोयाबीनमध्ये उगवण क्षमता कमी आहेच, तसेच उत्पन्न देखील कमी मिळण्याची शक्यता आहे. कंपन्यांकडील कमकुवत (बोगस) बियाणे महाग घेऊन पेरण्यापेक्षा घरगुती बियाणे वापरणे कधीही चांगले आहे.
घरगुती बियाणांचा गेल्या वर्षातील अनुभव असे सांगतो की, विविध कंपन्यांच्या बियाणांपेक्षा घरगुती बियाणांने गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगली साथ दिली होती. त्यामुळे यावर्षी देखील घरगुती बियाणे जतन करणे आणि तेच बियाणे पेरणीसाठी वापरण्याची मोहीम शेतकऱ्यांना राबवावी लागणार आहे.
नअनेक शेतकऱ्यांनी रब्बी आणि उन्हाळ हंगामात सोयाबीनची पेरणी केली आहे. या दोन्ही हंगामात मिळणारे उत्पादित सोयाबीन खरीप हंगामात बियाणे म्हणून वापरता येईल.
मात्र फेब्रुवारी-मार्च-एप्रिल महिन्यात पडलेल्या उन्हामुळे-उष्णतेमुळे सोयाबीन पिकांवर बराच परिणाम होत आहे. त्यामुळे या उत्पादनातून मिळालेले सोयाबीन किती दर्जेदार असेल? ही देखील शंका आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा